पूर्व इतिहास आख्यायिका

गर्भगिरी पर्वत रांगेतील उंच डोंगर पायथ्‍याशी असलेल्‍या मोहटा गावचे सत्‍पुरुष श्री रेणुका मातेचे परमभक्‍त श्री बन्‍सीबाबा दहिफळे हा दंडकारण्याचा प्रदेश येथे पूर्वी मोहाची खूप झोडे होती म्‍हणुन गावांस मोहटा गाव असे म्‍हणतात. गडाच्‍या दहाहि दिशांस पुण्‍यपावन, पवित्र व महामुनिंनी साधुसंताच्‍या तप:श्‍चर्येने पूनीत झालेली, पुरातन इतिहास असलेली पवित्र क्षेत्रे आहेत. अशा पवित्र पुण्‍यपावन पुण्‍यक्षेत्रामध्‍ये भक्त कल्‍याणार्थ मोहटा ग्राम नावाने श्री मोहटादेवी अवतीर्ण होऊन प्रसिध्‍द झाली. पूर्वीच्‍या काळी परिसरातील गावोगावचे अनेक भक्‍तांना संघटित करुन बाबा श्री क्षेत्र माहुरगडाची वारी करायचे. सर्व संसार, गायीगुरे बरोबर असायची. पायी चालावे, मुखाने जय जगदंब, जय जगदंब असे नामस्‍मरण, देवी चरित्राचे गुणगान, साधुसंताची चरित्र गाण शचिर्भूत होऊन नित्‍य उपासनाकर्म करावे, सदाचरणाने पायी चालावे व मुक्‍कामी स्‍थळी कीर्तन भजन करावे अशा दिनचर्येने माहुरगडी पोहचल्‍यावर मातृतीर्थचे स्‍नान करुन तीर्थजलाने श्री रेणुकामातेची पूजा, अभिषेक, साडी ओटी व महानैवेद्य पुरणपोळीचा अपर्ण करावा. श्री सप्‍तशतीपाठ, होमहवण, चंडीयांगाचे आचरण करावे अशी सारी सेवा करुन परत मोहटागांवी यावे. त्यांना जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा, त्‍यांच्‍या आचरणातुन प्रामाणिकपणे प्रपंच हाच जणू परमार्थ ही शिकवण समाजास मिळायची.

।। आधि प्रपंच करावा नेटका मग परमार्थ सुभटा ।।

ही समर्थांची शिकवण बाबांनी आचरणात आणुन ‘धन्‍य तो गृहस्‍थाश्रम’ अशी धन्‍यता मिळवूण त्‍यांनी देवी जवळ अधिकार मिळविला होता. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवोभव, अतिथी देवो भव ही वेद शिकवन स्‍वत:च्‍या अंगी बाणवून यथार्थ प्रयत्‍नपूर्वक स्‍वधर्माची ओळख करुन उत्तम जीवन बाबा जगले.

एकदा प्रसंग असा, माहुरगडाची वारी करतांना बाबा वयोमानाने थकले व त्‍यांनी श्री रेणुकामातेंची करुणा भाकली. आई, तुझा वियोग होऊ देवू नको, त्‍याच दिवशी बाबांना दृष्‍टांत झाला, मी तुझ्याबरोबर आहे असे, ध्‍वनी आकाशवाणीने बाबांच्‍या कानांवर पडले. त्यावेळी बाबांना विदेही अवस्‍था प्राप्‍त झाली. बाबा गावी निघाले तेव्‍हा त्‍यांचे जवळ असणारी पांढरी देवगुणी गाय हरवली. बाबा हळहळले. गावाकडे आल्‍यावर कालांतराने ही गाय डोंगर पायथ्‍याशी आहे, अशी वार्ता बाबांच्‍या कानी आली तेव्‍हा सवंगडयासह बाबा गाय धरण्‍यासाठी आले, तेव्हा गाय डोंगरावर वर वर चढू लागली. पुढे गाय, मागे भक्तंगण, अरण्यात्मक उंच डोंगर अशा अवस्‍थेत गाय डोंगर शिरी आली. आणि तिने थांबून पान्‍हा सोडला. लोक पहातात तो महद्आश्‍चर्य, ज्‍या ठिकाणी गाय पान्‍हावली तिथेच भव्‍य, दिव्‍य, सौंदर्य संपन्‍न तेजोमय देवीचा तांदळा. देवीस गाय जणू दुधाचा अभिषेक करते. धन्‍य झालो, भक्तगणांनीधन्‍य झालो असे उद्गार काढून श्री रेणुकेचा जयजय कार उदोकार केला व महानंदाने दर्शन घेतले.

पैठण क्षेत्री जावून पायी कावडीने भक्‍तगणांनी गंगोदक आणुन पवित्र गंगोदक तीर्थजलाने अभिषेक करुन अन्‍नदान केले. हा साक्षात्‍काराचा पुण्‍यपावन दिन आश्विन शु. एकादशी होय. तेव्‍हा पासुन आजपर्यंत हजारो भाविक पायी पैठणहून गंगाजल आणुन श्री मोहटादेवी गंगास्‍नान घालतात. अश्विन शु.IIएकादशीII भक्त यात्रौस्तव संपन्न करतात. मोहटागावते शक्तीपीठ श्री मोहटादेवीगडापर्यंत भव्य सवाद्य पालखीची मिरवणूक निघते हा पालखी सोहळा तेव्हा पासून आजपर्यंत चालू असुन पालखीपुढे शेकडो महिला आपल्या पदराने वाट झाडतात.